महाराष्ट्र राज्यात पाच जिल्ह्यामध्ये बर्ड फ्ल्यू; प्रशासन अलर्ट: बर्ड फ्लू 10 हजार कोंबड्या नष्ट करणार
परभणीसह मुंबई, ठाणे, दापोली आणि बीडमध्ये बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या पाचही जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट झाले आहे.
मुंबई, ठाणे, परभणी, दापोली आणि बीडमध्ये कावळे, पोपट आणि कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या पक्ष्यांचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. या प्रयोगशाळेचा अहवाल आला असून या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासन अलर्ट झाले असून सर्वांना सतर्कतेचा आदेश दिला आहे.
परभणीत बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. जिल्ह्यात आणि राज्यात बर्ड फ्ल्यूचा फैलाव होऊ नये म्हणून परभणीतील मुरुंबा गावातील तब्बल 10 हजार कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत.
परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यात या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचं निदान करण्यात आलं. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
संध्याकाळपर्यंत या दहा हजार कोंबड्या मारून जेसीबीने खड्डा खोदून त्यात या कोंबड्या गाडण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुरुंबा गावात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने मुरुंबा गाव बर्ड फ्ल्यू संसर्गित म्हणून घोषित करण्यात आलं आहे.